शुक्रवार, 7 जुलाई 2017

आदिवासी माहिती : त्यांची जीवनपद्धती आणि प्रकार



आदिवासी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी चित्रविचित्र कपडे घातलेले, डोक्याला पिसे लावलेले, किंवा कवड्या आणि मोठ्या मण्यांचे दागिने घातलेले असे लोक गोल फेर धरून नाचत आहेत असे दृश्य येते. आपण त्यांना असंस्कृत किंवा रानटी समजतो. आपण त्यांच्याबद्दल भलते सलते गैरसमज करून घेतो की ते नरभक्षक असतील किंवा नरबळी देतात. असे काहीही नाही. उलट आदिवासी ह्याचा अर्थच असा आहे की ते आपल्या आधी त्या स्थानावर राहत आहेत. ते मूळचे रहिवासी आहेत. तेथील जमीन,आकाश आणि पाण्यावर यांचा हक्क आहे. आपण त्यांच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. म्हणजे आपण उपरे आहोत.
आदिवासी म्हणजे दलित नव्हे. दलित आपल्या नागरी संस्कृतीचा एक हिस्सा आहे. आदिवासी भारतीय संविधानाच्या कलम 342 आणि 366 [25] प्रमाणे एक मूळ रहिवासी असून त्यांची वेगळी ओळख आहे. भारताच्या लोकसंख्येचा 8.6 % हिस्सा त्यांचा आहे. [2011 ची जनगणना] आतापर्यंत आपण त्यांना एक कुतुहुलचा विषय म्हणून पाहत होतो. पण बाबा आमटे, प्रकाश आमटे अनुताई वाघ आणि अशा अनेक समाजसेवक लोक आणि नक्षलवादी लोक यामुळे ते एकदम प्रकाशात आले. मग कळले की त्यांची पण एक पूर्ण विकसित अशी संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. पण वेगळेपणा, दुर्गम भाग, अशिक्षितपणा, आणि भाषेची अडचण आणि संकोच ह्यामुळे ते आपणामध्ये मिसळू शकत नाही. त्यातून आणखी वेगळेपण वाढून शेवटी त्याचे परिणाम त्यांच्या बंडखोरपणात होते. तसे पहायला गेले तर भारतात एकूण 679 आदिवासी जमाती आहेत.
आदिवासी मुख्यत्वे करून जंगलात डोंगरात आणि रानात राहतात. त्यामुळे ते शिकारी, खाद्य गोळा करणे आणि थोडी शेती करून गुजराण करतात. भारताच्या मध्य भागातील विंध्य आणि सातपुडा ह्या पर्वत रांगेत जास्तीत जास्त आदिवासी जमाती आहेत. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती आहे. भाषा आहे. एकूण आदिवासींच्या पैकी 75% ह्या प्रदेशात आहेत. ह्यात झारखंड, मध्यभारत आणि पश्चिम बंगाल येतो. ठळकपणे आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, गुजराथ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, प. बंगाल, आणि ईशान्य भारत आणि लक्षद्वीप व अंदमान निकोबार ही बेटे येथे आदिवासी बहुसंख्य आहेत. उत्तरेकडे जम्मू आणि काश्मीर तसेच दक्षिण भारत येथे पण थोड्या प्रमाणात आहेत. ह्यामध्ये मुख्य जमाती आहेत त्या म्हणजे कुकी, चकमा, गोंड, मुंडा, खासी, नागा, रंपा संथाळ, यादव, खोंड, मरिय, भिल्ल, कोकणा, खुर्दा इत्यादि आहेत. त्याना पूर्वी खूप महत्व असायचे . त्यांच्या वस्तीच्या जवळील खेड्यातील पंचायतीला मुख्य निर्णय घेताना त्यांची परवानगी घ्यावी लागायची. गोंड गर मंडल आणि चंदा हे लोक राज्य करीत होते.
पुरातन काळी त्यांना खूप मान दिला जायचा. महर्षि वाल्मिकी, ज्यांनी रामायण रचले त्यांना राजदरबारी सन्मान होता. एकलव्य हा भिल्ल राजकुमार होता आणि द्रोणाचार्यांचा शिष्य होता. त्याला धर्मराजाच्या राजसूय यज्ञासाठी निमंत्रण होते. निषाद स्त्री शबरी हिने रामाला उष्टी बोरे दिली. त्याने ती आवडीने खाल्ली. ऋषि मातंग यांना पण खूप मान होता.
आदिवासी मध्ये बरेच स्वातंत्र्य सैनिक होते. त्यापैकी तंट्या भिल्ल हा खूप नावाजलेला होता. तमार आणि झालडा हे पण ब्रिटीशांविरुद्ध बंडखोर म्हणून लढले. धरंधर भुयान, भागरू देवी, लक्ष्मण नाईक, जाण्या भिल्ल, रहमा वसावे अशी बरीच नावे घेता येतील ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केली.
आदिवासी खूप वेगळ्या भाषा बोलतात. त्यापैकी महत्त्वाच्या म्हणजे कोरकू, कोकमी, खरीय, गोंडी, गोरमाही, सावरा हलगी संथाली इत्यादि. त्यांचा मुख्य धर्म हिदू आहे आणि थोडे ख्रिश्चन आहेत. हिंदू असले तरी काही आदिवासी मूर्तिपूजक आहेत तर काही एका ईश्वराला मान देणारे आहेत. त्यांना सनामाही म्हणतात. आणि काही शरण प्रथा पाळतात. त्यात संथाली खुरुक आणि मुंडा हे लोक येतात. त्यांच्यात लग्नाच्या विशिष्ट प्रथा आहेत. एका जमातीत लग्ने होत नाहीत. राजा किंवा प्रमुख त्याच्या कर्तबगारीवर ठरतो वंशपरंपरेने नाही.
मधल्या काळात त्यांची स्थिती खूप खालावली गेली. शेत मालक कर भरू न शकल्याने कर्जबाजारी झाले. आणि सावकाराने आणि सरकारने विविध योजना मुळे त्यांना भूमिहीन केले. आणि त्यांनी नक्षलवादी होऊन बंड केले. त्यानंतर सरकारने आदिवासी विकास महामंडळ स्थापन केले. 1972 मध्ये समाज कल्याण विभाग स्थापन केला. त्यानंतर, आदिवासी विकास महामंडळ ह्याची स्थापना झाली. 22 एप्रिल 1984 मध्ये स्वतंत्र विभाग सुरू झाला. महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय सुरू झाले. त्याच्या अधीन ठाणे, नासिक, अमरावती आणि नागपुर ह्या चार शाखा काढल्या. त्यांच्या मध्ये 85%  दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यापैकी 40% शेतकरी आणि 45% शेतमाजुर आहेत.
महाराष्ट्रात उराव, कातकरी, कोलाम, गोंड, ठाकर, परधान, पावरा, माडीया गोंड, हलबा, भिल्ल, कोकणा, महादेव  कोळी अश्या जाती आहेत. विकास महामंडळ त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना करीत आहे. त्या ठाणे, रायगड, नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, नागपुर, यवतमाळ, भंडारा ,गोंदिया, चंद्रपुर, आणि गडचिरोली इथे विखुरले आहेत. त्यापैकी चंद्रपुर, गोंदिया आणि गडचिरोली इथले आदिवासी नक्षलवाद्यांच्या कारवायांना बळी पडत आहेत. सरकार त्यांना संरक्षण आणि विकास याची मदत करीत आहेत.
सध्या आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव झाली आहे. तसेच त्यांच्या मध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. नोकरीत आरक्षणामुळे त्यांची परिस्थिती सुधारून ते समजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. आठव्या पंच वार्षिक योजनेतून त्यांना शेतीला अनुदान विहिरीसाठी, पशू पालना साठी तसेच इतर जोड धंदे करण्यास अनुदान दिले जात आहे. तसेच त्यांच्या कलाकुसर, भांडी, व इतर कला गुणांना वाव मिळेल असे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या मधून खूप नामांकित लोक पुढे येत आहेत. उदा. कविता राऊत. त्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळून आदिवासींना त्यांचा जुना सुवर्णकाळ जागता येईल अशी अशा करूया.


संकलित : सुशिल म.कुवर